Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनो, गाव लहान असले तरी स्वप्न मोठी बाळगा! आ. श्री. सुधीर मुनगंटीवार...

विद्यार्थ्यांनो, गाव लहान असले तरी स्वप्न मोठी बाळगा! आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी साधला संवाद

सत्यशोधक न्यूज

मुख्य संपादक.राजू.एन.शंभरकर.मो.9511673435

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्या

कवडपेठ येथे शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

मुल – आपले गाव लहान आहे म्हणून आपण मोठे काम करू शकत नाही, असा न्युनगंड बाळगू नका. लहान गावातील लोक देशपातळीवर नाव कमावू शकतात, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे आपण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचेच मोठे स्वप्न बाळगले पाहिजे. त्यासाठी अहोरात्र परीश्रम घेतले पाहिजे, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

मुल तालुक्यातील कवडपेठ येथे तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चिचाळा ग्रामपंचायतच्या सरपंच जस्मिता लेनगुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, गटविकास अधिकारी श्री. राठोड, गट शिक्षणाधिकारी वर्षा पिपरे, चंदू मारगोनवार, पुजा डोहणे, प्रभाकर भोयर, प्रवीण मोहुर्ले, तुळशीराम कुंभारे, उमेश नागोसे यांची प्रमुख उपस्थिती होती. छोट्याशा गावात एका यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आ. श्री. मुनगंटीवार यांनी आयोजकांचे सुरुवातीला अभिनंदन केले. तसेच स्पर्धेच्या व्यवस्थेत गरज पडल्यास मदत करण्याचे आश्वस्त केले.

आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आपल्या गावात एवढा सुंदर कार्यक्रम होत आहे, याचे कौतुक आहे. आयोजन बघितले तर आपण मुंबईपासून लांब राहतो, असे कुणी म्हणू शकणार नाही. आपण गावात शिकतो म्हणून लहान असतो, असा न्यूनगंड बाळगू नका. माझे शिक्षण नगर परिषदेच्या शाळेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण ज्युबिली हायस्कूलच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. त्यामुळे आपण ठरवले तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नाव मोठे करू शकतो, हे लक्षात घ्या. हाच भाव आपल्या मनात निरंतर असू द्या.’

‘माझे गाव माझा अभिमान’ या हस्तलिखितांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यातून त्यांच्यामधील क्षमता दिसतात. गावाप्रती असलेल्या पवित्र भावनांचे दर्शन होते. या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे. ते कुठल्याही क्षेत्रात गेले तर यशस्वी होऊ शकतात. याचा अनुभव मला मिशन शौर्यच्या माध्यमातुन आला. या मोहिमेत १७-१८ वर्षांचे आदिवासी विद्यार्थी निवडले गेले. सगळे विद्यार्थी गरीब कुटुंबातील होते. त्यांनी कधी विमान बघितले नव्हते. विमान किती उंचावरून उडते हे पण बघितले नव्हते. पण तरीही आठ महिन्यांच्या परिश्रमात हे विद्यार्थी एव्हरेस्टवर पोहोचले आणि चंद्रपूर जिल्ह्याचा मान उंचावला,’ याचाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

माझा जिल्हा सदैव अग्रेसर असावा
माझ्या जिल्ह्यातील विद्यार्थी कौशल्यात मागे असायला नको, या उद्देशाने क्रीडाविषयक सोयीसुविधा मी उपलब्ध करून दिल्या. बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल, चंद्रपूर येथील स्टेडियम असेल किंवा इकोपार्क, ऑक्सिजन पार्क असेल. प्रत्येक प्रकल्पातून जिल्ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. शिक्षण, सिंचन, शेती, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांमध्ये काम करण्याची गरज आहे. त्याचाच भाग म्हणून एसएनडिटी विद्यापीठाचे केंद्र आपल्याकडे होत आहे. यातून मुलींना कौशल्य विकसित करता येईल, असेही ते म्हणाले.

हॅलो नव्हे वंदेमातरम्
आपल्या मनात सदैव देशाभिमान जागृत ठेवा. सहजतेने वंदेमातरम् म्हणायला सुरुवात करा. हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणायला शिका. मी देशाच्या जडणघडणीत काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करा, असे आवाहनही आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular