पूर्व विदर्भ प्रभारी ॲड. वामशीकृष्ण अरिकिल्ला यांनी मांडला जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरव्यवहाराचा मुद्दा
राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
95 11 67 34 35
चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) अंतर्गत वितरित होणाऱ्या धान्याच्या कथित काळाबाजाराला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) चे पूर्व विदर्भ प्रभारी (महाराष्ट्र) ॲड. वामशीकृष्ण हनुमंतु अरिकिल्ला यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात जिल्ह्यातील काही भागांत रेशनच्या धान्याची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या प्रकारांमुळे गरजू लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्याचा अपहार होत असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रेशन धान्याच्या कथित काळाबाजारामागील संपूर्ण साखळीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांनी समन्वयाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विषयाची दखल घेत योग्य स्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती ॲड. वामशीकृष्ण हनुमंतु अरिकिल्ला यांनी दिली.



